Posts

Showing posts from August, 2015

शेती आणि मोसमी पाऊस

नेमेचि येतो असे असले तरी भर पावसाळ्यात पावसाने ओढ दिली किंवा तो जास्त बरसला की शेतकऱ्यांच्या आणि बहुदा त्यांच्याहीपेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळते. मे महिन्यात पाणीटंचाईच्या बातम्यांपासून ते पावसाळ्याअखेरीपर्यंत कधी कोरड्या, कधी ओल्या दुष्काळाच्या बातम्या, त्यावर अवलंबून पीकपाण्याच्या नुकसानाच्या बातम्या प्रसारमाध्यमांत दिसून येतात. त्यानंतर मात्र, पावसाळ्याचे चार महिने उलटले की पुढील वर्षी उन्हाळा येईपर्यंत ‘पाऊसपाणी’ हा विषय विस्मृतीत जातो तो अध्येमध्ये अवेळी पावसाने शेतीचे नुकसान होईतोवर. हा दरवर्षीचा घटनाक्रम आहे. वास्तविक, भारतीय उपखंडात गेली कित्येक शतके लहरी पण वैशिष्ट्यपूर्ण मौसमी हवामान आहे. मात्र, आमच्या नियोजनकर्त्यांच्या ते अंगवळणी पडलेले दिसत नाही. शेती आणि भारतातील मौसमी पाऊस याकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहण्याचा आज प्रयत्न करूया. पर्यावरणशास्त्रानुसार शेती ही अनैसर्गिक कृती आहे. निसर्गात कुठेही फक्त आंब्याची शेकडो झाडे एकाच परिसरात उगवलेली आढळतात का? नैसर्गिक परिस्थितीत कोणतीही एकाच प्रकारची वनस्पती वरचढ ठरून विविधतेला मारक ठरू नये अशी काळजी सातत्याने