निसर्ग आणि पर्यटन (भाग २)

गेल्या खेपेस आपण अविचारी पर्यटनामुळे निसर्गावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत वाचले. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी जबाबदार पर्यटनाचे काही प्राथमिक निकष समजून घेण्याचा प्रयत्न करू. आपल्यापैकी काहीजण विविध प्रसंगी पर्यटक आणि यजमान अशा दोन्ही भूमिका बजावीत असतील; तर बाकी सगळे पर्यटकाच्या भूमिकेत अधूनमधून निश्चितच शिरत असतील, तेव्हा, या निकषांवर आपण कुठे आहोत, हे आपल्यापुरते तपासून पाहण्यास सुज्ञ वाचकांची हरकत नसावी!
निसर्ग-केंद्रित पर्यटन
निसर्गरम्य ठिकाणी पर्यटक येतात त्यामुळे अशा ठिकाणी पर्यटन व्यवसाय आपसूकच वाढू लागतो. मात्र, पर्यटन व्यवसाय वाढतो म्हणजे प्रामुख्याने पर्यटकांसाठी राहण्या-जेवण्याच्या पर्यायांमध्ये वाढ होते. जबाबदार पर्यटनात केवळ ही वाढ अपेक्षित नाही; तर पर्यटन निसर्गाभोवती विकसित झालेले असणे अपेक्षित आहे.  पर्यटनस्थळाची नैसर्गिक बलस्थाने जसे भौगोलिक वैशिष्ट्य, जैविक विविधता व त्यावर आधारून रुळलेली पारंपरिक जीवनशैली, सांस्कृतिक वैशिष्ट्ये केंद्रस्थानी ठेवणारे पर्यटन हवे. उदाहरणार्थ – वाघाच्या जंगलात जाणारा पर्यटक फक्त वाघ बघून परत येतो. वाघाचे जंगल कसे आहे, त्यात कोणत्या वनस्पती व इतर प्राणी आहेत, तिथे आदिवासी राहतात का, असल्यास त्यांची जीवनशैली कशी आहे, तिचा जंगलावर व पर्यायाने वाघावर काय परिणाम होतो, वाघाच्या संवर्धनास पर्यटकांचा खरोखरीच हातभार लागतो का इत्यादी बाबी पर्यटकापर्यंत पोहोचत नाहीत. पर्यटकाला वाघ बघण्यात रस असतो, आणि स्थानिकांनाही केवळ वाघ दाखविला म्हणजे पुरे, असे वाटते.
निसर्ग-केंद्रित पर्यटनाची काही लहान मॉडेल वैयक्तिक पातळीवर विकसित केल्याचे दिसून येते. सह्याद्री निसर्गमित्र हे संस्था कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर कासवे अंडी घालण्यासाठी येतात अशा ठिकाणी त्यांच्या विणीचा हंगाम लक्षात घेऊन कासव महोत्सव आयोजित करते. वडिलोपार्जित शेती-वाडी, जुने कौलारू घर अशा पारंपरिक वैशिष्ट्यांवर आधारित घरगुती पर्यटन व्यवसाय करणारी कुटुंब परिचयाची आहेत. मात्र, त्यांची संख्या आणि व्याप्ती कमी आहे.
भौगोलिक वैशिष्ट्ये मात्र दुर्लक्षित राहिली आहेत. समुद्रकिनाऱ्याचे चलनवलन हे दैनंदिन भौगोलिक घटना आहे. त्यातून वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना निर्माण झालेल्या, होत असलेल्या दिसतात. अशा ठिकाणांचे महत्त्व पर्यटकांना समजावून देण्यासाठी जवळपास राहणारे भूगोल विषयाचे शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी यांच्या सहयोगाने व्यवस्था निर्माण करता येऊ शकते. असे त्या त्या परिसरातील वेगवेगळ्या परिसंस्थांसाठीही करता येईल. 
पर्यटनस्थळी व्यवसाय करणाऱ्यांनी अशी स्थानिक वैशिष्ट्ये जाणून घेऊन अभ्यासली म्हणजे त्यांना पर्यटकांना नवी माहिती देता येईल. त्याच बरोबर पर्यटकाने नव्या ठिकाणी जाण्यापूर्वी थोडा गृहपाठ केल्यास त्याची यात्रा अधिक अनुभवसंपन्न होण्यास मदत होईल.
केल्याने देशाटन, मनुजा चातुर्य येतसे फार
या सुभाषितानुसार पर्यटनामुळे माणसाच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणे अपेक्षित आहे. आपण बदल म्हणून, नवे पाहण्या-अनुभवण्यासाठी पर्यटनस्थळी आलो आहोत, याचे भान जबाबदार पर्यटक सतत बाळगतो. कुतूहल, चौकस बुद्धी, मोकळे मन, नवे जाणून-समजून- प्रसंगी शिकून घेण्याची, थोड्या गैरसोयीशी जुळवून घेण्याची तयारी जबाबदार पर्यटनात अपेक्षित आहे. पर्यटनस्थळी असलेला निसर्ग, स्थानिक लोक, खाद्यसंस्कृती, जीवनशैली आणि या सगळ्याच्या क्षमता व मर्यादा पर्यटकाने लक्षात घ्यायला हव्या. “इथे अमुक मिळत नाही का? बरं मग त्या ऐवजी हे लोक काय करतात?”, “इथली पद्धत अशी आहे का? ती का रूढ झाली असावी?” असे प्रश्न मनात यायला हवेत. स्थानिक लोकांबरोबर संवाद साधून त्यांची उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न व्हायला हवा.
पर्यटनस्थळीसुद्धा ‘घरच्यासारख्या सोयीसुविधा, घरच्यासारखेच जेवण, खोलीत एअरकंडिशन, टीवी हवाच’ हे आग्रह धरल्यास नवे काहीही आजमाविण्याची संधी पर्यटक स्वतःच गमावून बसतो.
पर्यटकाने जसा आवडीनिवडींचा अट्टहास बाळगू नये; तसेच यजमानांनी पर्यटकांचे सर्व हट्ट – विशेषतःचोचले पुरविण्यास ठाम नकार द्यावा. अर्थात, गरजेच्या प्राथमिक सुविधा जरूर पुरवाव्यात. दिखाऊ सजावटीपेक्षा नीटनेटकेपणा, स्वच्छता महत्त्वाची.
खाली हाथ आए थे...
रिकाम्या हाताने जाणे आणि अनुभवसंपन्न होऊन, पण रिकाम्या हाताने परतणे हा जबाबदार पर्यटनाचा आणखी एक निकष आहे. यासाठी पर्यटनाला निघण्यापूर्वी सामान भरतानाच काळजी घेणे अपेक्षित आहे. पर्यटकाने गरजेपुरतेच सामान घ्यावे. आपल्या सामानातून वेष्टने, अतिरिक्त खाद्यपदार्थ, काचेच्या, प्लास्टिकच्या बाटल्या असा कचरा निर्माण होणार नाही, अशा बेताने सामान घ्यावे. श्रीमंतीचे प्रदर्शन करणाऱ्या महागड्या वस्तू नेणे हे पर्यटकाच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते. गुन्हेगारी प्रवृत्तीला वाव मिळतो, तसेच स्थानिक लोकांमध्ये त्यातून न्यूनगंड व जीवनशैलीविषयी चुकीच्या महत्त्वाकांक्षा निर्माण होऊ शकतात.
पर्यटनस्थळी निसर्ग ओरबाडून आठवणीसाठी वस्तू गोळा करू नयेत. तसेच, खरेदीचा मोह टाळावा. बाहेरगावाहून परतताना खाऊ, आठवण म्हणून त्या ठिकाणचे प्रतीक असलेली वस्तू किंवा तेथील एखादे वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन आणण्यात गंमत वाटते, हे खरे असले; तरी बरेचदा उत्साहाच्या भरात पर्यटक नको त्या वस्तूंची भरमसाठ खरेदी करतात. अशा वस्तूंच्या निर्मितीसाठी नैसर्गिक साधनसंपत्ती खर्च झालेली असते, हे लक्षात घ्यावे. वस्तूरुपाने आठवणी जमविण्यापेक्षा अनुभवातून त्या निर्माण कराव्यात, असे जबाबदार पर्यटन सांगते.
पर्यटन हंगामी; पण बंध कायमचे!
बहुतांश पर्यटनस्थळी पर्यटन हा हंगामी व्यवसाय आहे. मात्र, ते तसे होण्यामागे ऋतुमानानुसार येणाऱ्या नैसर्गिक मर्यादा, सणावारांच्या, शाळा-महाविद्यालयांच्या सुट्यांची उपलब्धता हे घटक कारणीभूत आहेत. या घटकांवर मात करून वर्षभर पर्यटकांना आकर्षित करता आले; तर बरे असा विचार बहुतेक पर्यटन व्यावसायिक करतात.

जबाबदार पर्यटन मात्र जाणीवपूर्वक हंगामी असते. पर्यटनाच्या हंगामात पर्यटन व इतर काळात स्थानिकांनी आपापले दैनंदिन, पारंपरिक व्यवहार सुरू ठेवावेत. जेणेकरून, त्यांना पर्यटनाखेरीज उपजीविकेची इतर साधने उपलब्ध राहतील. त्याचप्रमाणे नैसर्गिक चलनवलनात पर्यटनामुळे होणारा मानवी हस्तक्षेप मर्यादित राहील.
जबाबदार पर्यटनात पर्यटक आणि स्थानिक लोकांमध्ये भावनिक बंध जुळणे अपेक्षित आहे. त्यातून त्या पर्यटनस्थळाविषयी आपुलकी वाटून त्याची जपणूक करण्याची भावना पर्यटकाच्या मनात निर्माण होणे अपेक्षित आहे. नेपाळमध्ये जाऊन आलेल्या किती पर्यटकांनी भूकंपाविषयी कळल्यावर आपल्या तिथल्या यजमानांशी संपर्क साधून त्यांची चौकशी केली? नेमाने कोकणात येणारे किती पर्यटक समुद्रात तेल सांडल्यावर आपल्या आवडत्या समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी पुढे सरसावतात?

संपूर्ण पर्यटन क्षेत्र जबाबदार करण्यासाठी शासकीय पातळीवर मोठे धोरणात्मक बदल आवश्यक आहेत. त्याकरिता स्थानिकांनी आग्रह धरायला हवा, मात्र, ते साध्य  होत नाही तोवर किमान आपल्या परिसरात दीर्घकाळ टिकेल व परिसरही निसर्गरम्य राहील असा पर्यटन विकास साधण्यासाठी वैयक्तिक पातळीवर, गाव पातळीवर शक्य ते सर्व प्रयत्न करणे नक्कीच शक्य आहे!

(पूर्वप्रसिद्धी: दैनिक कृषीवल एप्रिल २०१५)

Comments