रानातून पानात (भाग २): रानभाज्या ही दैनंदिन वापरातील जैवविविधता!

आहारात विविधता असेल; तर रोजचे जेवण आनंददायी होते. आपल्या अवतीभवती असलेला निसर्ग वैविध्यपूर्ण असेल; तर ती विविधता आपल्या आहारात परावर्तित होते, असे आहाराच्या पारंपरिक सवयींबद्दल म्हणता येत असे. एक काळ असा होता की साठवणीचे तंत्रज्ञान, दळणवळणाची साधने फारशी नसल्याने जिथे जे पिकते, तिथे ते खाल्ले जात असे. मग, आहारात विविधता आणण्यासाठी अवतीभवतीच्या निसर्गात लक्ष ठेवावयाचे आणि ऋतूमानानुसार मिळतील त्या रानभाज्या, फळांचा आस्वाद घ्यायचा, ही जगण्याची रीतच होती. तसेच, ऋतूगणिक मिळणाऱ्या अनेक वनस्पतींचा वापर त्या त्या काळातील सण, धार्मिक रुढींमध्येही झालेला दिसतो. अशा पारंपरिक पद्धतींचा जैवविविधतेच्या संरक्षण-संवर्धनाला अप्रत्यक्ष हातभार लागत असे. तो असा, की आहारातील विविधतेच्या निमित्ताने निसर्गातील विविध वनस्पतींविषयीची 
भारंगी
माहिती व्यवहारात राहिली. वनस्पतीचे जीवनचक्र, तिची उपलब्धता, गुणधर्म, उपयुक्तता, पाककृती या विषयीची माहिती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत राहिली. वनस्पतीही आहारात असल्याने त्यांच्या उपलब्धतेवर लक्ष राहिले. क्वचित एखादी वनस्पती नेहमीच्या तुलनेत कमी प्रमाणात मिळाली अथवा मिळेनाशी झाली; तर ते लक्षात येत असे. अलीकडच्या काही दशकांत मात्र या प्रक्रियेला खीळ बसू लागली आहे. जैवविविधतेचा ऱ्हास
होत आहे असे म्हणतात, तो केवळ जंगली प्राण्यांची संख्या कमी झाल्याने होतो असे नव्हे; तर त्यामध्ये अशी छोटी छोटी, दैनंदिन वापरातील जैवविविधताही असते.

पावसाळ्याच्या सुरुवातीला कोरळ किंवा कोरल नावाच्या लहानशा झाडाला पालवी फुटते. ही कोवळी 
आपट्याच्या पानांसारखी पाने असलेली कोरलाची भाजी
पाने पालेभाजी म्हणून खाल्ली जातात. आपट्याच्या पानांसारखी ही पाने दिसतात आणि वनस्पतीशास्त्रीय वर्गीकरणानुसार ही वनस्पती आपट्याच्या कुळातच गणली जाते. हे झाले पावसाळ्यापुरते, पण आपट्याच्या कुळातील आणखी एक वनस्पती रक्तकांचन – हिला गडद गुलाबी फुले येतात. या फुलांच्या पाकळ्यांपासून गुलकंद किंवा मुरांब्यासारखा प्रकार बनवितात. श्वेतकांचन ही याच कुळातील आणखी एक वनस्पती, हिच्या फुलांची भाजी करतात, असा एक उल्लेख मध्यंतरी वाचनात आला. मात्र, कोणतीही रानभाजी खात्रीपूर्वक ओळख पटल्याशिवाय आणि ती कशी बनवावी हे निश्चितपणे माहिती असल्याखेरीज खाऊ नये. 


तेराळूच्या जोडीने ठेवलेल्या टाकळ्याच्या लहानशा जुड्या.


टाकळ्याची भाजी बहुतेक लोकांच्या परिचयाची असेल. पावसाळा सुरू झाला की रानात, अंगणात, रस्त्याच्या कडेला टाकळा उगवलेला दिसतो. मात्र, टाकळ्याची कोवळी पानेच भाजीसाठी घ्यावीत असे सांगतात. रत्नागिरीतील पटवर्धन बाईंनी माहिती दिली की श्रावणातील शनिवारी, याला शंपट शनिवार असेही म्हणतात, टाकळ्याची भाजी आणि तांदळाच्या कोंड्याची भाकरी असा नैवेद्य मारुतीला दाखवितात. कुर्डू नावाची रानभाजीही या दिवसांत मिळते. जमिनीलगत वाढलेल्या रानात गुलाबीसर पांढरे कणसासारखे पण लहान लहान तुरे येणारी वनस्पती दिसते, ही कुर्डू! कुर्डूच्या पानांची कांद्यावर परतून केलेली भाजी चवदार 
शेवग्याच्या शेंगांच्या जोडीने ठेवलेली अंबाड्याची फळे.
असते. अंबाड्याच्या फळांचे लोणचे किंवा आंबटगोड चटणी करून खातात.
कंटोली किंवा करटुली ही रानभाजी गेल्या काही वर्षांत ठराविक समाजात भलतीच लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे बाजारात ही भाजी पाव किलोला ६०-७० रुपये भावाने विकली जाते. कारल्याच्या कुळातील ही चविष्ट, खाशी रानभाजी आता सर्वसामान्यांना परवडेनाशी झाली आहे.
दातेरी पानांची भारंगीची भाजी ही पाऊस सुरू झाल्यावर आठवडाभरात बाजारात येते. पावसाळ्याच्या दिवसांत गढूळ पाण्यामुळे होणाऱ्या रोगांना नियंत्रणात ठेवण्यासाठी व पचनसंस्थेचे आरोग्य चांगले राखण्यासाठी ही भाजी खावी, असे सांगतात. कुड्याच्या शेंगाही पोटासाठी गुणकारी मानल्या जातात. 
पोटासाठी गुणकारी कुड्याच्या शेंगा!
उन्हाळ्यात कुड्याच्या पांढऱ्या फुलांची भाजी करतात; तर पावसाळ्यात शेंगांची. एका देठाला दोन हिरव्या-तपकिरी शेंगा येतात. या चिकट असल्याने पाण्यात उकळून घेऊन पाणी टाकून देतात आणि मग भिजवलेले वाल घालून त्यांची भाजी करतात. कुड्याच्या शेंगांची चटणीही करतात. ही वनस्पती जुलाबावर औषध आहे.
सध्या या रानभाज्या कर्जत, पेण, रोहे, माणगाव या ठिकाणी बाजारात विक्रीसाठी आलेल्या दिसतात. शेतातून येणाऱ्या नेहमीच्या किंवा त्याच त्या भाज्यांच्या तुलनेत यांचे प्रमाण कमी असते त्यामुळे या पटकन् संपूनही जातात. वाशीच्या भाजीबाजारात रानभाज्या आवर्जून विक्रीसाठी आणणाऱ्या संगीता कोळी यांच्याकडे ठराविक भाज्यांसाठी गिऱ्हाईक भल्या सकाळी येते आणि तरीही भाजी संपलेली असेल किंवा मिळालीच नसेल; तर दुसऱ्या दिवशीसाठी नंबर लावून जाते. मात्र, एकूणात रानभाज्या आवर्जून खाणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. कर्जत तालुक्यातील एका लहानशा गावातील बाईंच्या घराबाहेर परसात भरपूर टाकळा उगवलेला पाहून रानभाज्यांचा विषय निघाला. तेव्हा, त्या म्हणाल्या, “पूर्वी आम्ही रानभाज्या खायचो, हल्ली नाही खात. बाजारातून कोबी-फ्लॉवर आणतो. गावातही फारसे कुणी खात नाही. मुलांनाही नको असतात.”  आगळ्यावेगळ्या चवीच्या, वर्षाभरात ठराविक काळापुरत्या उपलब्ध होणाऱ्या या भाज्या लोकांना खाव्याशा वाटू नयेत, हे दुर्दैव आहे.
पाककृती
अंबाड्याची चटणी
जिन्नस: अंबाड्याची ५,६ कच्ची फळे, पाच मोठे चमचे खोवलेले ओले खोबरे, बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या, चिमूटभर हिंग, जिरे, गूळ आणि मीठ चवीनुसार.
कृती: अंबाड्याची फळे स्वच्छ धुवून, वाफवून घ्यावीत. वाफवलेली फळे गार झाल्यावर बी काढून टाकावे. फळांचा गर आणि वर दिलेले जिन्नस एकत्र करून मिक्सरमध्ये वाटावे.

(रविवार, दिनांक १३ जुलै २०१४ रोजी 'कृषीवल' मध्ये प्रकाशित)

Comments

  1. Thanks for this informative article🙏🏼

    ReplyDelete

Post a Comment